रजनीश वाणी: भाग 32.
रजनीश वाणी :भाग 32
जीवनाला जेवढे तुम्ही जागे राहून जगताल तेवढ्याच बारीक आणि सूक्ष्म जीवनाचा तुम्हाला अनुभव येईल, आणि जेवढ्या सूक्ष्माचा तुम्ही अनुभव कराल तेवढेच जास्त तुम्ही जाणताल.ते दोन्ही संयुक्त आहेत आणि एक दुसऱ्याचे सहयोगी आहेत.रस्त्यावर तुम्ही चालत आहात, दारुड्या व्यक्ती पण चालत आहे त्याच रस्त्यावर, पण त्याचे पाय बघा,एकही पाय जागेवर पडत नाही.तसे तर तोही घरी पोहोचेलच.तुम्ही पण चालता आणि मग तुम्ही एका बुद्धालाही चालताना पहा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये आणि दारुड्या व्यक्तीमध्ये जेवढा फरक आहे, तितकाच तुमच्यामध्ये आणि बुद्धामध्येही आहे.तसे तर दारुड्या व्यक्तीही घरी पोहोचतो, तुम्हीही घरी पोहोचता, बुद्ध ही घरी पोहोचतील, पण तुमच्या चालण्याचा गुण वेगवेगळा आहे.दारुड्या व्यक्ती बिलकुल बेहोशी मध्ये चालत आहे, बुद्ध बिलकुल शुद्धीवर राहून चालत आहेत ,तुम्ही कुठेतरी दोघांच्या मध्ये आहात.कधीतरी थोडीशी शुद्धीची झलक मिळते, पुन्हा अंधार येतो.कधी तुम्ही जागे असता, कधी तुम्ही झोपलेले असता,कधी तुमचे डोळे उघडे असतात, कधी बंद होऊन जातात.तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितले, तर तुम्हाला दिसेल की जशी जशी तुमची जागृती वाढेल, तुमच्या चालण्यामध्ये एक सुगढता, एक कुशलता, ज्याला गीतेमध्ये कृष्णाने म्हटले आहे की योगी कर्मामध्ये कुशल होऊन जातो, ती कुशलता.कारण योग्याला खूप तलम चादर विणावी लागते.त्याला एक एक पाऊल सांभाळून ठेवावे लागते, एकेक श्वास जपून घ्यावा लागतो.जीवन खूप नाजूक आहे ,आणि फार बहुमूल्य आहे.तो दारुड्यासारखे चालत नाही.कबीराने म्हटले आहे की तो असा चालतो की जशी गर्भवती स्त्री चालत असते,सांभाळून ,काळजीपूर्वक. तिच्यामध्ये एक नवे जीवन आहे.आणि गर्भवतीच्या मध्ये जे जीवन आहे ते तर शारीरिक आहे.साधकांमध्ये, साधूच्या मध्ये जो जीवनाचा अंकुर फुलत आहे ,तो तर परमात्म्याचा अंकुर आहे.तुम्ही असा विचार करा की परमात्मा तुमच्या मधून जन्म घेणार आहे ,तर तुम्ही किती सांभाळून चालणार नाहीत! थोडीशी चूक, आणि गर्भपात होऊ शकतो .थोडीशी चूक, पाय मुडपणे, ,पडणे, आणि युगायुगांचे श्रम व्यर्थ होऊ शकतात.जसजसे तुमचे गं तव्य स्थान जवळ येऊ लागते ,तसे तसे जास्त जागृत राहण्याची आवश्यकता पडते.कारण गंतव्य स्थानापासून दूर होता तेव्हा भटकण्याची कोणती भीतीच नव्हती.कारण भटकताल तर काय होणार होते ?आधीच भटकलेले होता.गंतव्य जवळ आल्यावर जास्त शुद्धीवर राहण्याची, जागृत राहण्याची गरज पडते,कारण आता भटकू शकता.सुफी म्हणतात, संसारिकांना काय भीती? भीती तर आम्हाला आहे.संसारिका जवळ हरवण्यासारखे काय आहे? हरवण्या सारखे तर आमच्या जवळ आहे.आणि संसारिकाला वाटेल तर तो कसाही चालू शकेल.मिटण्यासाठी त्याच्याकडे काहीही नाही.पण आम्ही कसेही चालू नाही शकत कारण मोठी संपदा आहे, जी मिळता मिळता हरवून जाऊ शकते.जी हातात येता येता वंचित होऊन जाऊ शकते.जिच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगदी जवळ होतो आणि गंतव्य स्थान हरवून जाऊ शकते.आणि तुम्ही जेवढ्या उंचीवर असाल तिथून पडाल तर तेवढ्याच खोल दरीमध्ये उतरताल.यामुळे जतन या शब्दाला खूप लक्षात ठेवा.जो माणूस दरीमध्ये सरकत आहे त्याला कशाचे भय? पण जो गौरी शंकराच्या शिखरावर उभा आहे, भीती त्याला आहे.पण ही भीती म्हणजे भय नव्हे.ही भीती म्हणजे एक सावचेतता आहे.हे भय या गोष्टीचे आहे की माझ्याकडे काहीतरी आहे, जे हरवून जाऊ शकते.
भगवान श्री रजनीश कबीर वाणी.
अनुवाद:प्रा.महेंद्र देशमुख.मोबाईल क्रमांक: 90 966 94 200.
Comments
Post a Comment