ओशो वाणी भाग, 3
ओशो वाणी भाग 3. प्रत्येक प्रश्न आपल्या जन्मासोबतच स्वतःच्या उत्तरालाही जन्म देत असतो. कुठलेच प्रश्न बिना उत्तराचे नसतात. असा कुठलाही प्रश्न नाही ज्याचे उत्तर नसते. पण दुसऱ्याचे उत्तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर होऊ शकेल की नाही हे सांगता येणार नाही. प्रश्न तुमचा आहे, उत्तर माझे आहे. हे अंतर खूप मोठे झाले. हे अंतर एवढे मोठे झाले की त्यात सेतू निर्माण होईल, हे अंतर पार होऊ शकेल का यात शंकाच आहे.तुम्ही तुम्ही आहात, मी मी आहे. मग माझे उत्तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर कसे बनू शकेल? हा सेतू निर्माण कसा होईल? मग मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर का देतोय? व्यर्थ मेहनत का करतोय? यासाठी नाही की माझी उत्तरे तुमची उत्तरे बनावित तर यासाठी की तुम्हाला हे लक्षात यावे की कुठलाही प्रश्न बिना उत्तराचा नसतो,आणि तुम्ही आपल्या उत्तराच्या शोधात निघावे. मला असे वाटते की तुम्ही आपले उत्तर शोधावे. पण कदाचित आपण उत्तर शोधता शोधता निराश झाला असाल आणि आपण उत्तराचा शोध थांबवला असेल. निराश होण्याचे काही कारणही नाही. स्वतःच्या अंतरात खोलवर खोदत जा, ज्या चित्ताने प्रश्न निर्माण केला आहे, तेच चित्त त्याचे उत्तर निर्माण करण्यात ही समर्थ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल,प्रश्न कठीण आहेत, उत्तर नेहमी सरल आहेत.प्रश्न विचारणे खरी गोष्ट आहे. पण आपण प्रश्नच विचारत नाही आणि जे प्रश्न आपण विचारतो, तेही स्वतःचे नसतात, तेही कुठे ऐकलेले, पुस्तकातून वाचलेले, जवळ जवळ उधार असतात. प्रश्नच आपले नसतात तर उत्तरे आपली कशी असतील?स्वतःचा प्रश्न शोधा. जर आपण आपल्या जीवनात निर्माण होणारे प्रश्न शोधू शकला तर ही मोठी उपलब्धि आहे. तेच ते, ऐकलेले, उधारचे प्रश्न विचारू नका. कारण हे प्रश्न तुमचे नसल्यामुळे कुठल्याही उत्तराने तुमचे समाधान होणार नाही. ते तहान नसणाऱ्या व्यक्तीला पाणी पाजण्या सारखे आहे. तहान स्वतःची असली पाहिजे. खरी असली पाहिजे. प्रश्न शोधा आणि नंतर मौन होऊन शांतपणे उत्तराची प्रतीक्षा करा. घाई करू नका. घाईत मिळालेली उत्तरे स्मृतीवर आधारित असतील. उत्तर येत नसेल तर समजून घ्या आता उत्तर मिळू शकते. उधारची उत्तरे सोडून द्या.उधार प्रश्न विचारू नका. सर्व उधार ची उत्तरे सोडून द्या. फक्त तुमचा प्रश्न राहू द्या..जळत्या निखाऱ्या सारखा. येणारी कुठलीही स्मृतिवर आधारित उत्तरे स्वीकारू नका. मग तुमच्या आतून, उत्तर येईल जे तुमच्या आत्म्याने दिले असेल. प्रश्र्नांसोबत जगणे ही एक कला आहे. जो शांतीने आपल्या मनात प्रश्नांची बीजे लपवून जगत राहतो, त्याला उत्तर नक्कीच मिळते. प्रा. महेंद्र देशमुख.9096694200
Comments
Post a Comment